पुणे : सोनेरी मयुरपंखी रथाला गुलाब पुष्पांची आकर्षक सजावट आणि त्यावर कोल्ड फायरची विद्युत रोषणाई, ढोल ताशांचा गजर, मर्दानी खेळांचे सादरीकरण आणि भंडारा उधळत काढण्यात आलेल्या दिमाखदार मिरवणुकीने हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला. यावेळी हजारो भाविक उपस्थित होते.
मंगळवारी सकाळी अनंत चतुर्थीला आचार्य स्वामी गोविंद गिरी महाराज यांच्या हस्ते रंगारी बाप्पाची पुजा व आरती झाली. त्यांनतर साडेआठ वाजता वरद विघ्नेश्वर वाड्यातून मयुरपंखी रथातून बाप्पा महात्मा फुले मंडईतील लोकमान्य टिळक पुतळ्याकडे मार्गस्थ झाला. याठिकाणी प्रथा परंपरेनुसार टिळकांच्या पुतळ्याला आणि मानाच्या पाच गणपतींना ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’कडून पुष्पहार घालून या वैभवशाली विसर्जन मिरवणूकीला सुरवात झाली. विसर्जन मिरवणुकीत पारंपारिक रथाला ओढणाऱ्या बैलांना होणारा त्रास लक्षात घेऊन उत्सवप्रमुख व विश्वस्त पुनीत बालन यांनी रथासाठी बैलजोडी न वापरण्याचा निर्णय घेतला होता.
१३२ वर्षांनंतर पहिल्यांदाच स्वतंत्र रथ तयार करण्यात आला होता. सोनेरी आकर्षक असे मयुरपंखी रथ मिरवणुकीत लक्ष वेधून घेत होता. उत्सवप्रमुख पुनीत बालन यांनी या रथाचे सारथ्य केले. साधारण पहाटे सव्वा तीनच्या सुमारास प्रत्यक्ष मिरवणुकिला सुरवात झाली. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांचा पुतळा आणि त्यावर नगरा मिरवणुकीत पुढे होते. त्यापाठोपाठ मर्दानी खेळांच्या पथकाकडून केल्या जाणाऱ्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले होते. तर समर्थ, शिवमुद्रा आणि श्रीराम पथक यांच्या ढोल पथकांच्या वादनाने मिरवणुकीचा उत्साह वाढवला.
विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर ठिकठिकाणी कार्यकर्त्यांकडून भंडाराची उधळण केली जात होती. तर मिरवणूक मार्गावरील गणेश भक्तांकडून फुलांची उधळण केली जात होती. तर रथावर कोल्ड फायरची होणारी विद्युत आतषबाजी त्यामुळे ही मिरवणूक भक्तांच्या डोळांचे पारणे फेडणारी अशीच ठरली. सकाळी साडे ७ वाजता टिळक चौकात मयूरपंखी रथ आल्यानंतर सह पोलिस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांच्या हस्ते बाप्पांची आरती झाली आणि बाप्पा विसर्जनासाठी मार्गस्थ झाले. सकाळी साडे ८ च्या सुमारास श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे भक्ती भावाने भावपूर्ण विसर्जन करण्यात आले.
महत्वाच्या बातम्या-
-‘या दादासाठी जशी लाडकी बहिण तसाच….’; आमच्यासाठी काय म्हणणाऱ्या तरुणांना अजित पवारांचं उत्तर
-बाप्पा निघाले गावाला! दुपारचे २ वाजले तरी मिरवणूक काही संपेना
-पठारेंच्या हाती तुतारी; वडगाव शेरीत राजकीय समीकरण बदललं
-पुण्यात कायदा सुवस्थेचे धिंडवडे; ३ दिवसांत ३ गोळीबार, शहरात नेमकं काय चाललंय?