पुणे : पुणेकरांना उन्हाळ्यात नेहमीच पाणीकपातीला सामोरे जावे लागते. मात्र आता पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. या उन्हाळ्यात पुणेकरांना पाणीकपातीचा सामना करावा लागणार नाही. कारण यंदा शहरात पाणीकपात करण्यात येणार नाही. पुणे शहराला १५ जुलैपर्यंत पुरेल इतका खडकवासला साखळीत येणाऱ्या ४ धरणात पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली आहे.
मागील वर्षी पडलेल्या पावसापेक्षा यंदा अधिक पाऊस पडल्यामुळे गतवर्षीपेक्षा यंदा खडकवासला धरण साखळीत दोन टक्क्यांनी पाणीसाठा अधिक आहे. खडकवासला धरण साखळीतील ४ धरणांमध्ये ११.९१ टीएमसी इतका पाणीसाठा जमा आहे. पुण्याला खडकवासला प्रकल्पामधील वरसगाव, पानशेत, खडकवासला आणि टेमघर या चार धरणांतून पाण्याचा पुरवठा होतो. या सर्व धरणांमध्ये सध्या ४०.८३ टक्के पाणी उपलब्ध असल्यामुळे येत्या उन्हाळ्यात पुणे शहरात पाणीकपात केली जाणार नाही.
पुणेकरांना १५ जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा सध्या धरणामध्ये शिल्लक आहे. त्यामुळे शेती सिंचनासाठीही पुढील दोन महिने पाणी देण्यात येणार आहे. १५ जुलैपर्यंत पुढच्या ९८ दिवसांसाठी ४.९९ टीएमसी पाणी शहराला लागणार आहे. तेवढे पाणी खडकवासला प्रकल्पात आरक्षित ठेवण्यात आले आहे. सर्वांना पाणी पाणी पुरवठा करून देखील धरणांमध्ये १ अब्ज टीएमसी पाणी शिल्लक राहणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली आहे.